मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. अनेक प्रकल्पाचे काम 70 ते 90 टक्के झाले आहे. येत्याकाळात लवकरच हे प्रकल्प नागरिकांच्या सेवेत येणार आहेत. ठाणे-भिवंडी-कल्याण हा मेट्रो मार्गदेखील लवकरच सेवेत येणार आहे. या मेट्रोमार्गाचे काम ठाणे ते धामणकर नाक्यापर्यंत झाले आहे. मात्र धामणकर नाका ते दुर्गाडी या दरम्यान मेट्रोच्या कामात अनेक अडचणी आहेत. लवकरच या मेट्रो मार्गाचा एक टप्पा भुयारी असणार आहे.
ठाणे-भिवंडी-कल्याणला जोडणाऱ्या मेट्रो लाइन 5 प्रकल्पाचे 80 टक्के झाले आहे. हा मेट्रो मार्ग झाल्यावर लोकलवरील गर्दीचा ताण कमी होणार आहे. मेट्रो लाइन 5 चा मार्ग 24.90 किमी लांबीचा एलिवेटेड कॉरिडोर आहे. या मार्गिकेवर 15 मेट्रो स्थानके आहेत. मेट्रो मार्गिका 5 चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान असणार आहे. 31 मार्च 2025 पर्यंत ही मेट्रो सेवेत येणार आहे.
धामणकर नाका ते दुर्गाडी मेट्रोचा मार्ग हा भुयारी असेल अशी माहिती खा. बाळ्या मामा ऊर्फ सुरेश म्हात्रे यांनी दिली. म्हात्रे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. म्हात्रे यांनी सांगितले की, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेचे काम ठाणे ते धामणकर नाका दरम्यान मार्गी लागले आहे. धामणकर नाका ते दुर्गाडी या दरम्यान भुयारी मार्ग केला जाणार आहे.
अशी असतील स्थानके
1. बाळकुम नाका, 2. कशेली, 3. काल्हेर, 4. पूर्णा, 5.अंजुरफाटा, 6. धामणकर नाका, 7. भिवंडी, 8. गोपाळ नगर, 9. टेमघर, 10. रजनोली, 11. गोव गाव, 12 कोन गाव, 13. लाल चौकी, 14. कल्याण स्टेशन, 15. कल्याण एपीएमसी.
भिवंडीकरांना मुंबईत येण्यासाठी एक ठाण्यामार्गे लोकलपकडून यावे लागते किंवा रस्ते मार्गे. भिवंडीतून ठाण्याला येण्यासाठीही रिक्षा किंवा बसने यावे लागते. पण या मेट्रोमुळं मुंबईकरांना थेट शहरात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांचा 50 ते 75 टक्के वेळ कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी 8416.51 इतका खर्च येण्याची शक्यता आहे
