सूर्य आग ओकणार! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत  चालली आहे. एप्रिल महिन्यात तापमानात मोठी वाढ होईल असा इशारा आधीच देण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरला असून या महिन्यात उष्णता प्रचंड वाढली आहे. राज्यात अनेक  ठिकाणी पारा ४५ अंशांपर्यंत पोहोचला आहे. काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भात सध्या उष्णता प्रचंड वाढली आहे. चंद्रपूर सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. चंद्रपूरमध्ये तापमान ४५.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अकोला, अमरावती, नागपूर आणि ब्रह्मपुरी या शहरांतही तापमानाने ४५ अंशांपर्यंत मजल गाठली आहे. या दिवसांत नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम विदर्भासह पूर्व भागातील शहरांत तापमानात वाढ होणार आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत पारा वाढणार आहे. या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूरसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीतील नागरिकांना सुद्धा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, २९ एप्रिलपर्यंत देशात अनेक भागांत उष्णता वाढणार आहे. पश्चिम मध्य प्रदेशात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती दिसून येईल. २६ एप्रिलपर्यंत उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आज आणि उद्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णता वाढण्याची शक्यता आहे.

वाढत्या उष्णतेचा शेतीवर फटका

उष्णतेच्या वाढत्या प्रमाणामुळे शेतीच्या उत्पादनावरही परिणाम होत आहे. यंदा थंडी कमी पडल्याने गव्हाची वाढ नीट झाली नाही. त्यामुळे हलक्या प्रतीचा गहू मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे. यामुळे गव्हाला कीड लागू शकण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये गव्हाची आवक १५ मार्चपासूनच सुरू झाली असून, सध्या गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून गहू येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *