राज्यातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक वीजग्राहकांना दिलासा मिळणार असून एक एप्रिलपासून वीजबिल कमी होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, टाटा, अदानी व बेस्टसह अन्य वीज वितरण कंपन्यांचे नवीन वीज दर लागू करण्यास आयोगाने शुक्रवारी मध्यरात्री मंजुरी दिली. स्मार्ट मीटर (टीओडी) बसविणाऱ्या औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच आणि रात्री बारा ते सकाळी सहापर्यंतच्या वीजवापरास १०-३०टक्के वीजदर सवलत मिळेल, मात्र सायंकाळी पाच ते रात्री १०-१२ वाजेपर्यंतच्या वीजवापरासाठी २० टक्के जादा मोजावे लागतील. म्हणजे त्यांना एका हाताने दिलेला लाभ दुसऱ्या हाताने काढून घेतला जाईल.
महावितरण व अदानी कंपनीचे वीजदर एक एप्रिलपासून सरासरी १० टक्के, टाटा कंपनीचा १८ टक्के तर बेस्टचा वीजदर ९.८२ टक्के कमी होईल. पुढील पाच वर्षात अपारंपारिक क्षेत्रातील सौर व अन्य स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याने वीजदर कमी होणार आहेत.
