मोदी सरकारने माजी पंतप्रधान आणि जाट नेता चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्विटर) अकाऊंटवरुन याची माहिती दिली. पीए मोदी यांनी तीनही महान व्यक्तींच्या योगदानाबद्दल माहिती देत भारत रत्नची घोषणा केली. त्याआधी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनाही भारत रत्न जाहीर करण्यात आला होता.
संजय राऊत यांचा आरोप
दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही भारतरत्नच्या निमित्तानं भाजपवर निशाणा साधलाय. हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं विस्मरण झालं. आधी दोन आणि आता एकदम तीन असे एका महिन्यात पाच नेत्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आले..मात्र त्यात वीर सावरकर आणि बाळासाहेबांच्या नावाचा समावेश नाही. ही केवळ निवडणुकांची धामधूम सुरू आहे अशी टीका राऊतांनी केलीय. खरं तर नियम असा आहे की एका वर्षात जास्तीत जास्त 3 भारतरत्न देता येतात. मोदी यांनी एका महिन्यात 5 जणांना भारत रत्न जाहीर केले. कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवानी यांच्या मागोमाग आता चौधरी चरण सिंग.पी वी नरसिंहराव आणि एम एस स्वामिनाथन यांना भाररत्न ने सन्मानित केले….आणखी काही नेते प्रतीक्षेत आहेत. पण मा.बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का? ज्यांनी सारा भारत हिंदुमय केला…ज्यांच्यामुळे मोदी अयोध्येत राममंदिर सोहोळा करू शकले असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
राज ठाकरे यांचाही सवाल
त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यायला हवा अशी मागणी केली आहे. नरसिंहराव, चौधरी चरण सिंग, प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भाजप प्रणित सरकारनं राजकीय औदार्य दाखवलंच आहे. तर मग बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न घोषित करून हेच औदार्य दाखवावं, असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल, असंही राज म्हणाले.
