मुंबईत धुक्याचे साम्राज्य

हवामान विभागाने राज्यात थंडीच्या हंगामात पावसाची शक्यता वर्तविली आहे. पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, या कालावधीत मुंबईत अंशतः ढगाळ वातावरण आणि धुके पडणार आहे. यामुळे मुंबईतील धुरक्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढणार नसले तरी धुरक्याच्या प्रमाणात वाढ होणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नाही. मात्र या काळात धुके आणि आर्द्रता असल्याने धुरक्याची तीव्रता कायम असेल.

मध्य भारतावर दोन वेगळ्या दिशांनी येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव आहे. तसेच हवेतील वरच्या थरात ही प्रणाली चक्रीय वात स्थिती स्वरुपात आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या नैऋत्येला चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांसोबत आर्द्रताही असल्यामुळे मध्य भारतात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार ते रविवार या काळात महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज आहे. तसेच रायगडमध्ये रविवारी हलका पाऊस होईल. धुळे, नंदुरबार येथे रविवारपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी, शनिवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली असली तरी किमान तापमान वाढलेले असेल. या आठवड्यानंतर किमान तापमानाचा पारा पुन्हा एकदा खाली उतरायला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *