मुंबई लोकलमधून पडून मृत्यूमुखी पडणाच्या घटना दररोज समोर येत असतात. दरम्यान एका घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाच्या घरच्यांना 8 लाखांची भरपाई मिळणार आहे. पण ही भरपाई तब्बल 13 वर्षांनंतर मिळणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वेला यासंदर्भातील आदेश दिला आहे.
अरुण धोत्रे यांच्या मुलगा अल्पेश याचा पश्चिम रेल्वेतून प्रवास करताना पडून मृ्त्यू झाला होता. यावर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अपिलावर सुनावणी घेताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे. धोत्रे यांचा मुलगा 26 जानेवारी 2010 रोजी मित्रांसोबत भाईंदर ते वसई दरम्यान रेल्वेने जात होता. नायगाव ते वसई स्थानकादरम्यान गाडी येताच डब्यात प्रचंड गर्दी झाल्याने तो खाली पडला आणि त्यातच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. तो 20 वर्षांचा होता.
दरम्यान 13 वर्षांनी याप्रकरणाचा निकाल आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सहा आठवड्यांच्या आत भरपाईची रक्कम जमा करण्यास सांगितले आहे. ही रक्कम तरुणाचे वडील अरुण धोत्रे यांना देण्यात येणार आहे.
