ठाण्याच्या काही भागात आज ५० टक्के पाणी कपात, ऐन पावसाळ्यात नागरिकांपुढे पाणी टंचाईचे संकट

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून उल्हास नदी पत्रातील पाणी उपसा केंद्रात अडकलेला कचरा काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे ठाणे शहराच्या काही भागात आज, शनिवारी ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांपुढे पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उल्हास नदीच्या पात्रातून पाणी उचलते. या पाण्याचे वितरण मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा आणि वागळे इस्टेटमधील काही भागात करण्यात येते.

गेल्या काही दिवसांपासून नदी क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे वाहून आलेला कचरा पाणी उपसा करणाऱ्या पंपाजवळ येऊन अडकला आहे. यामुळे पुरेशा पाण्याचा उपसा करणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला शक्य होत नाही. त्यामुळे महामंडळाकडून हा कचरा काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे शनिवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीमध्ये ठाणे शहरात ५० टक्के पाण्याचा कमी पुरवठा होणार आहे. त्यामध्ये दिवा, मुंब्रा ( प्रभाग क्र. २६ आणि ३१ चा काही भाग वगळून), कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरूनगर, तसेच मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत कोलशेत खालचा गाव या भागांता समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *