शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या सुमारे चाळीस हजार असल्याची माहिती मिशन रेबीज अंतर्गत सुरू असलेल्या ‘फिरता दवाखाना’ उपक्रमाचे प्रमुख प्रवीण ओव्हळ यांनी दिली. शहरात रेबीजमुळे दहा वर्षांत ५९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.कुत्र्याचे निर्बिजीकरण, लसीकरण या बद्दल जनजागृती मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी ‘वर्ल्ड वाइड व्हेटरनरी सर्व्हिसेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धार्थ उद्यानात रेबीजविषयी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. यासाठी ‘होप ॲनिमल ट्रस्ट’च्या सहकार्याने साई ॲनिमल केअर मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या बद्दल ओहळ यांनी माहिती दिली. सर्वसामान्यांना सर्वांत जास्त कुत्र्याची भीती वाटते. ती दूर करायची असेल, तर लसीकरण आणि निर्बिजीकरण हे दोनच पर्याय आहेत, याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. कुत्र्यांबद्दल नागरिकांच्या मनात गैरसमज आहेत, ते दूर होणे गरजेचे आहे, त्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. देशभरात दरवर्षी रेबीजने सुमारे साठ हजार व्यक्तींचा मृत्यू होतो असा उल्लेख त्यांनी केला. गोवा हे एकमेव राज्य रेबीजमुक्त झाले आहे असेही त्यांनी सांगितले. या वेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, सौरभ जोशी, शहर अभियंता ए.बी. देशमुख, उपायुक्त विजय पाटील, संजय नंदन, रावसाहेब जावळे आदी उपस्थित होते.
