याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपये द्या! ; मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याने उच्च न्यायालयाकडून खरडपट्टी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्याची हमी राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) दिली होती. मात्र, याचे पालन झाले नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दोन्ही यंत्रणांवर ताशेरे ओढले. त्याचवेळी २०१८ पासून याचिकेद्वारे महामार्ग चौपदरीकरण व खड्डय़ांचा पाठपुरावा करणाऱ्या याचिकाकर्त्यांला न्यायालयीन लढाईसाठी आलेल्या खर्चाचे ५० हजार रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने सरकार आणि एनएचएआयला दिले.

गेली १३ वर्षे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (एनएच-६६) चौपदीकरणाचे काम रखडले आहे. महामार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे दोन्ही मुद्दे जनहित याचिकेद्वारे न्यायालयासमोर मांडण्यात आले आहेत. न्यायालयाने याचिकेची दखल घेऊन चौपदरीकरणाचे काम जलदगतीने करण्याचे आणि खड्डे दुरुस्त करण्याचे वेळोवेळी आदेश दिले आहेत. त्यावर कामे विशिष्ट काळात पूर्ण करण्याची आणि महामार्ग खड्डेमुक्त करण्याची हमी राज्य सरकार आणि एनएचएआयकडून दिली गेली होती. मात्र, दोन्ही यंत्रणांकडून त्याचे पालन झाले नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांने अवमान याचिका दाखल केली आहे.  बुधवारी झालेल्या सुनावणीत प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने फटकारले.

 खड्डे दुरुस्तीच्या दाव्यावरही आक्षेप..

कामाला झालेल्या विलंबामुळे आधीच्या कंत्राटदाराशी झालेला करार रद्द करण्यात आला. मात्र, या कंत्राटदाराने त्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे काम पूर्ण होण्यास विलंब झाल्याचे एनएचएआयच्या वकिलांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. एनएचएआयच्या या दाव्याचाही न्यायालयाने समाचार घेतला. महामार्गावरील खड्डे निदर्शनास आणून देण्यासाठी याचिकाकर्ते किंवा नागरिकांची आवश्यकता का आहे, असा सवाल न्यायालयाने केला.

‘प्रत्यक्ष पाहणी करा’

एनएचएआयचे प्रकल्प संचालक आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधीक्षक अभियंत्यांना महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी व चार आठवडय़ांत अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले. चौपदरीकरणाचे काम दोन ते तीन वर्षांत पूर्ण केले जाईल, अशी हमी दिली होती. त्यावर विश्वास ठेवून आम्ही मूळ याचिका निकाली काढली. परंतु, दोन्ही यंत्रणा स्वत:च दिलेल्या हमीचे उल्लंघन करीत आहेत. – उच्च न्यायालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *