मुंबईमध्ये अतिवृष्टीचा इशारा; ठाणे, पालघर, रायगडमध्येही दोन दिवस मुसळधार

उशिराने दाखल झालेल्या मोसमी पावसाने मुंबईसह उपनगरांमध्ये तळ ठोकला असून पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, कोकण तसेच पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नर्ऋत्य  मोसमी वाऱ्यांनी रविवारी संपूर्ण राज्य व्यापले. गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पश्चिम घाट, कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात २७ ते २८ जून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, सोमवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात पावसाची नोंद झालीच नाही, तर सांताक्रूझ केंद्रात २७.० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांना मंगळवारी, २७ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर आणि रायगड जिल्ह्यांना २७ ते २८ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी पावसाची विश्रांती मुंबईत रविवारी मोसमी पाऊस दाखल झाला. त्यानंतर पुढील काही दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र मुंबई आणि उपनगरांत सोमवारी संध्याकाळपर्यंत जास्त पाऊस पडला नाही. सायंकाळी काही भागात रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर नवी मुंबईत मात्र सोमवारी सायंकाळनंतर पावसाने जोर धरल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *