पहिल्याच पावसात मिरा-भाईंदर जलमय; नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह

मिरा-भाईंदरमध्ये शनिवारी हजेरी लावलेल्या पावसाचा जोर सायंकाळी चांगलाच वाढला आणि या पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. त्यातून वाट काढताना मिरा-भाईंदरवासीयांची दैना उडाली. काही भागात घरांमध्येही पाणी शिरले. यामुळे पालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून केलेल्या नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वाढलेल्या उकाड्यामुळे मिरा-भाईंदरवासींना मागील काही दिवस पावसाची प्रतीक्षा लागली होती. अखेर शुक्रवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. त्यानंतर शनिवारी संपूर्ण दिवसभर रिमझिम पाऊस पडत होता. संध्याकाळी दीड ते दोन तास पावसाचा जोर चांगलाच वाढला. त्यामुळे मिरा रोड व भाईंदरमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. परिणामी, पाण्यातून वाहने चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागली.

या व्यतिरिक्त काही भागांमध्ये सोसायटीतील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले होते. शांतीनगरमधील काही दुकानांतही पावसाचे पाणी शिरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. हे पाणी उपसून बाहेत काढण्यातच नागरिकांची रात्र गेली.

शहरात पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने सुमारे चार कोटी रुपये खर्च करून नालेसफाई केली आहे. हे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता. त्यानंतरही पहिल्याच पावसात, शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यावर मिरा-भाईंदरवासींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याचे पडसाद समाजमाध्यमांवरही उमटले.

राई-मुर्धा रस्त्यालगत तयार करण्यात आलेल्या कच्च्या नाल्यात काही वाहने शिरल्याने अपघात झाला. साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने या घटना घडत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. सखल भागात पाणी साचल्यानंतर, रात्रीच्या सुमारास पालिकेने त्याचा उपसा करण्यासाठी पंप बसवून ते सुरू केल्याचे नागरिकांनी सांगितले.

रेल्वे प्रवाशांचेही हाल
पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. परिणामी विरारच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लोकल मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यान एका तासाहून अधिक काळ उभ्या होत्या. त्यामुळे भाईंदरच्या अनेक प्रवाशांनी अंधारात रुळावरून चालत भाईंदर रेल्वे स्थानक गाठले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *