मानसिक आजारमुक्त व्यक्तींना पुढील उपचाराची गरज नसते. ही व्यक्ती बेघर असल्यास किंवा त्यांचे कुटुंबीय स्वीकारत नसल्यास या व्यक्तींसाठी शासनाने राज्यात पुनर्वसनगृह उभारण्याची योजना आखली आहे. येथे या व्यक्तींना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यासह इतरही सोय उपलब्ध केल्या जाणार आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर, पुणे, ठाणे व रत्नागिरी येथे पुनवर्सनगृह स्थापन होईल. येथे १८ ते ५५ वयोगटातील तसेच ५५ वर्षांवरील वयोगटातील ज्येष्ठ अशा दोन्ही वयोगटातील पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण १६ पुनर्वसनगृहे सुरू होईल. या पुनर्वसनगृहांच्या खर्चापोटी पाच कोटी ७६ लाख रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. दुसऱ्या टप्यामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शिफारशीनुसार मानसिक आजारमुक्त व्यक्तींची संख्या वाढल्यास, त्यानुसार पुनर्वसनगृहांच्या संख्येत वाढही केली जाणार आहे.
पुनर्वसनगृहाने प्रवेश दिलेल्या व्यक्तीस विविध प्रकारचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल. त्याचप्रमाणे त्यांचे पुनर्वसन करणे, समुपदेशन करणे, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणे, त्यांचा निवास, भोजन, क्रीडा व मनोरंजन, स्वच्छता, संरक्षण आदी बाबींची जबाबदारी घेतली जाणार आहे. पुनर्वसनगृह चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस १२ हजार रुपये प्रती व्यक्ती प्रती महिना सहायक अनुदान देण्यात येईल. अशा संस्थांची निवड करण्यासाठी राज्य स्तरावर निवड समिती असेल.
