अरबी समुद्रात सुरु झालेलं बिपरजॉय हे चक्रिवादळ आता महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासू मैलोंच्या अंतरानं दूर असलं तरीही या वादळाचे परिणाम मात्र राज्यातील हवामानावर आणि पर्यायी राज्यातील मान्सूनवर स्पष्टपणे दिसून येत आहेत. सध्याच्या घडीला हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे वादळ गुजरातच्या किनारपट्टी भागातून पुढे कराचीच्या दिशेनं वळत असल्याचं पाहायला मिळत आहे.
15 जून रोजी सायंकाळच्या सुमारास हे वादळ अधिक तीव्र रुपात येणार असून, याचा फटका गुजरात ते कराचीदरम्यानच्या किनाऱ्यांना बसणार आहे. ज्या धर्तीवर सध्या बचाव पथकं आणि सर्वच यंत्रणा तैनाक ठेवल्या असून प्रशासनही या वादळावर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, वादळ महाराष्ट्रापासून दूर गेलं असलं तरीही त्याचे परिणाम मात्र राज्यात कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवस म्हणजेच 48 तासांमध्ये मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा सुटणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. इतकंच नव्हे, तर काही भागांमध्ये पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. असं असलं तरीही हा पाऊस क्षणिकच असेल हेसुद्धा तितकंच खरं.
