मुंबई अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती, भाई जगताप यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्याशी चर्चा…”

भाजपाप्रमाणे काँग्रेसमध्येही संघटनात्मक बदल सुरु झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ( ९ जून ) मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांच्या जागी आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ही घोषणा केली आहे. यावर आमदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

“याबद्दल माझ्याशी चर्चा करण्यात आली होती. आठवडाभर ही चर्चा सुरु असून, नेत्यांशी बोलूनच हा निर्णय झाला आहे. कृपाशंकर सिंह, संजय निरूपम, मिलिंद देवरा यांच्याशी चर्चा करूनच अन्य लोकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच, एकनाथ गायकवाड यांच्याशी बोलूनच माझीही नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे मुंबई काँग्रेस एका महिलेला संधी देते, याचा मला आदर आणि अभिमान आहे,” असं भाई जगताप म्हणाले.

“वर्षा गायकवाड यांनी मंत्री म्हणून आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं आहे. माझ्या नियुक्तीवेळीही वर्षा गायकवाड यांचं नाव चर्चेत होते. त्यामुळे हटवणं आणि ठेवणं हा प्रकार काँग्रेसमध्ये नसतो,” असं स्पष्टीकरण भाई जगताप यांनी दिलं.

विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवानंतर दलित चेहरा देण्यात यावा म्हणून वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नावर भाई जगताप यांनी सांगितलं की, “जाती धर्म बघून कधीही काँग्रेसने निर्णय घेतले नाहीत. या गोष्टीचा आणि विचारांचा मला अभिमान आहे.”

“देशातील मुली एका खासदाराच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. तरीसुद्धा ५६ इंच वाले मोदी आणि त्यांचं सरकार डोळे झाकून बसले असून, त्यांना लाज वाटायला पाहिजे. मुंबईतील आणि सावित्रीबाई फुले वसतिगृहात झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांची नियुक्ती अतिशय योग्य आहे,” असंही भाई जगताप यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *