राखीव साठ्यामुळे पाणीसाठा वाढला, एकूण पाणीसाठा आता १८ टक्क्यांवर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा कमी झाल्यामुळे राखीवसाठा वापरण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आता पाणीसाठा वाढला आहे. सध्या सातही धरणांत ११ टक्के पाणीसाठा असला तरी राखीवसाठा धरून १८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणांत मिळून सध्या केवळ ११.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत असल्यामुळे पुरेसा पाऊस पडेपर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे. मात्र सध्या असलेला पाणीसाठा हा केवळ २५ जूनपर्यंत पुरेल इतकाच आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिका प्रशासनाने भातसा व उर्ध्व वैतरणा धरणातील राखीवसाठा वापरण्याकरीता राज्य सरकारला आधीच पत्र पाठवले होते. दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारने त्याकरीता मंजुरी दिली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे पाणी पुरणार आहे. राखीवसाठा गृहीत धरून सध्या १८.६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

सात धरणातून मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्षलीटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. पावसाला सुरुवात होऊन पुरेसा पाऊस धरणक्षेत्रात पडेपर्यंत वेळ लागणार आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर पाण्याची पातळी वाढायला लागेपर्यंत हे पाणी पुरवावे लागणार आहे.

सातही धरणांत मिळून सध्या १ लाख ६१ हजार २९७ दशलक्ष लीटर पाणीसाठा शिल्लक आहे. तर राखीवसाठा उपलब्ध झाल्यामुळे उर्ध्व वैतरणा धरणातून ६२ हजार दशलशलीटर आणि भातसा धरणातून ७५ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा अधिकचा मिळणार आहे. त्यामुळे पाणीसाठा २ लाख ६८ हजार दशलक्षलीटरपर्यंत उपलब्ध आहे. हा साठा १८.६७ टक्के आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *