१० कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी; नऊ परदेशी महिलांना अखेर जामीन

सुमारे १० कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमाशुल्क विभागाने अटक केलेल्या नऊ परदेशी महिलांना अखेर महिन्याभरानंतर न्यायालयाने जामीन दिला. प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला.

केनिया एअरवेजच्या विमानाने मुंबई विमानतळावर आलेल्या नऊ महिलांना २५ एप्रिल रोजी सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तवार्ता कक्षाच्या (एआययू) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. तस्करी करून काही वस्तू आणल्याबाबत विचारणा केली असता या महिलांनी नकारार्थी उत्तर दिले. त्यामुळे त्यांनी सोबत आणलेल्या सामानाची तपासणी करण्यासाठी त्यांना थांबवून एका खोलीत बसवण्यात आले होते. त्यावेळी आरोपी महिलांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना पुन्हा प्रवेशद्वाराजवळून एआययूच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे २४ कॅरेटचे १३,६४० ग्रॅम सोने, २१ कॅरेटचे २,३४० ग्रॅम व १८ कॅरेटचे १,१३६ ग्रॅम सोने सापडले. तसेच १,१३६ ग्रॅम सोन्याचे दागिनेही त्यांच्याकडे सापडले. आरोपी महिलांकडून एकूण १८ किलो २८० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत नऊ कोटी ४२ लाख रुपये आहे.

याप्रकरणी सीमाशुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अर्दो नूर, शुक्री फराह, केरो जामा, हबीबा उमर, एब्ला अब्दुलाही, अनाब मुहुमेद, अनीसा मुबारक, इस्निना युसूफ, जैनाब मोहमूद या महिलांना सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्या सर्व महिला कापड विक्रीसंबंधित कामे करतात. सर्व महिला २६ ते ४७ वयोगटातील आहेत. अटक आरोपी महिला असून त्यांची लहान मुले आहेत, तसेच गुन्ह्यांबाबत चौकशीसाठी यंत्रणेला बराच अवधी मिळाला असल्याचा युक्तीवाद आरोपींकडून करण्यात आला होता. त्याचा सीमाशुल्क विभागाने विरोध केला. दोन्ही बाजू ऐकून अखेर न्यायालयाने या महिलांना जामीन दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *