गेल्या काही दिवसांत राज्यभरात दोन समाजात होणाऱ्या वादामुळे हिंसाचाराच्या घटना घडताना पाहायला मिळतायत. छत्रपती संभाजीनगरपासून सुरु झालेल्या वादाचे लोण आता राज्यभरात पसरलंय. अकोल्यात शनिवारी हरिहरपेठ भागात दोन गटात झालेल्या वादानंतर दंगल उसळली. यात 20हून अधिक जण जखमी झालेत. अनेक दुकानं आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली.. शनिवारपासून दंगलग्रस्त भागात संचारबंदी लावण्यात आलीय. तर रविवारी रात्री नगरच्या शेवगावमध्ये दंगल उसळली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती मिरवणूकीवर दगडफेक करण्यात आल्यानं दोन गट आमनेसामने आले. तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीला प्रवेश देण्यावरुन दोन गटात बाचाबाची झाली..
महाराष्ट्रात 2 महिन्यात 3 दंगली
30 मार्च – संभाजीनगर
13 मे – अकोला
14 मे – शेवगाव (अहमदनगर)
कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न?
कुणीतरी जाणीवपूर्वक महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतंय, या प्रकारांना कुणाची तरी फूस आहे असा आरोप गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. पण जे हे गैर कृत्य करतायत ते सफल होणार नाहीत अशा लोकांना आम्ही सोडणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तर शिंदे-फडणवीस सरकारच दंगली घडवून आणतंय असा पलटवार ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी केलाय.
अजित पवारांची प्रतिक्रिया
अशा गोष्टींना राज्य सरकारने आवर घातला पाहिजे, तपास यंत्रणेच्या हातात खूप काही गोष्टी असतात. वादग्रस्त क्लिप व्हायरल करण्यामागचा मास्टरमाईंड कोण होता, त्याचा उद्देश काय होता याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलीय.
अकोल्यातील दंगल कशामुळे?
एका फेसबूक पोस्टमुळे अकोल्यात राड्याला सुरुवात झाली. कुणीतल फेसबूकवर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आणि वातावरण चिघळलं. त्यानंतर दोन समुदायात राडा झाला. जमाव रस्त्यावर उतरला आणि त्यांनी जाळपोळ, हिंसाचार सुरुकेला. वाहनांची तोडफो करण्यात आली. दुकानं फोडली काही घरही पेटवण्याचा प्रयत्न जमावाकडून झाला. या प्रकरणी आतापर्यंत 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसंच शहरात राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं.. महाराष्ट्राला सांस्कृतिक सलोखा आणि पुरोगामित्वाची परंपरा आहे. मात्र काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या याच परंपरेला नख लागताना दिसतंय, जे नक्कीच भूषणावह नाही..
