एकत्र लढण्याचा मविआचा निर्धार, शरद पवार यांच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा आणि सक्षम पर्याय देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने रविवारच्या बैठकीत घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट तसेच अन्य घटक पक्षांचे नेते जागावाटपाबाबत चर्चा करतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झाली. बैठकीस उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर आघाडीच्या वज्रमूठ सभा पुन्हा सुरू होतील. पुढील सभा पुण्यात होणार असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार या सभेत करण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, ‘‘भाजपचा कर्नाटकमध्ये मोठा पराभव झाला आहे. या निवडणूक निकालाचे विश्लेषण करण्यात आले. जनतेमध्ये भाजपविरोधात रोष होता, तो मतपेटीतून व्यक्त झाला. कर्नाटकमधील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यावरचा राग मतदानातून काढला आहे.’’

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळविल्यावर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतही उत्साह संचारला आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांची एकजूट झाली असून त्या दृष्टीने निवडणुकाही एकत्र लढविण्यावर एकमत करण्यात आले. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून अधिक मोठय़ा संख्येने आणि ताकदीने महाविकास आघाडी पुढच्या काळात काम करणार आहे. महाराष्ट्राला सक्षम आणि ठोस पर्याय देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करणार आहे. यावर आजच्या बैठकीत एकमत झाल्याचेही पाटील यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत आणि पुढील वाटचालीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने मर्यादा घालून विधानसभा अध्यक्षाना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्याची जबाबदारी दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्या दृष्टीने ते निर्णय घेतील, असे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातही भाजपचा पराभव अटळ : राऊत

राऊत म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. कर्नाटकमध्ये काँग्रेसच नव्हे, तर देशातील विरोधी पक्ष जिंकला आहे. महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम होणार आहे. महाराष्ट्रातही भाजपचा पराभव होऊन कर्नाटकची पुनरावृत्ती होणार आहे. आमच्या जागावाटपाची  इतरांनी चिंता करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *