आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा आणि सक्षम पर्याय देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने रविवारच्या बैठकीत घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट तसेच अन्य घटक पक्षांचे नेते जागावाटपाबाबत चर्चा करतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झाली. बैठकीस उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर आघाडीच्या वज्रमूठ सभा पुन्हा सुरू होतील. पुढील सभा पुण्यात होणार असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार या सभेत करण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, ‘‘भाजपचा कर्नाटकमध्ये मोठा पराभव झाला आहे. या निवडणूक निकालाचे विश्लेषण करण्यात आले. जनतेमध्ये भाजपविरोधात रोष होता, तो मतपेटीतून व्यक्त झाला. कर्नाटकमधील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यावरचा राग मतदानातून काढला आहे.’’
महाराष्ट्रातही भाजपचा पराभव अटळ : राऊत
राऊत म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. कर्नाटकमध्ये काँग्रेसच नव्हे, तर देशातील विरोधी पक्ष जिंकला आहे. महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम होणार आहे. महाराष्ट्रातही भाजपचा पराभव होऊन कर्नाटकची पुनरावृत्ती होणार आहे. आमच्या जागावाटपाची इतरांनी चिंता करू नये.
