अर्धवेळ पद असल्याने ग्रंथालये पूर्णपणे सक्षमतेने चालत नसल्याची तक्रार होती. नव्या निर्णयाने ती दूर होणार आहे. नव्या आकृतीबंधनुसार राज्यातील सहावी ते बारावीपर्यंत एक हजारावर विद्यार्थी असणाऱ्या शाळांमध्ये पूर्णवेळ एक ग्रंथपालाचे पद मान्य करण्यात आले आहे. त्यानुसार २११८ पदे मंजूर होतात. तसेच अर्धवेळ ग्रंथपाल पद व्यपगत म्हणजे मृत संवर्गात गेले आहे.
या पार्श्वभूमीवर कार्यरत असलेल्या १२७६ अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळचा दर्जा देणार. मात्र, उपलब्ध पदे ११९२ एवढीच आहेत. प्रथम दोन हजारावर विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना पूर्णवेळ ग्रंथपाल मिळणार. त्यानंतर तीन हजारावर विद्यार्थी असलेल्या ५३ शाळांना १०६ पदे मिळतील. उर्वरित पदे ही वेगळ्या निकषावर भरल्या जातील.
दोन व तीन शाळा एकत्रित करीत एक हजारावर विद्यार्थी संख्या निश्चित होईल. निर्माण होणाऱ्या पदांवर प्रथम अर्धवेळ ग्रंथपाल नियुक्त होणार आहे. सेवाज्येष्ठता आधारे व सलग पाच वर्षे सेवा झालेल्या मान्यताप्राप्त अर्धवेळ ग्रंथपालांनाच पूर्णवेळ पदाचा लाभ मिळणार. तसेच त्यांची सेवा ही पूर्णवेळ पदाच्या आगावू वेतनवाढीसाठी लागू होणार नाही.
