महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने केरळ रेल्वे आग प्रकरणातील आरोपी शाहरुख सैफी याला मंगळवारी रात्री उशिरा रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. त्याला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, केरळ पोलिसांचे एक पथक रत्नागिरीला रवाना झाले आहे.
व्यवसायाने सुतार असलेला ३० वर्षीय सैफी मंगळवारी रात्री ११.३० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकात झोपलेला आढळला. या घटनेत तो जखमी झाला असून त्याच्यावर रत्नागिरीतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केंद्रीय गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही त्याला ताब्यात घेतले. त्याने आपला गुन्हा कबूल केला असून, त्याला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे महाराष्ट्र एटीएसमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
