अवकाळी पावसाचा रेल्वेला फटका, मुंबईत लोकल सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने

अचनाक अवकाळी पाऊस आल्याने अनेकांची सकाळी ताराबळ उडाली.  मुंबई आणि परिसरात झालेल्या झालेल्या अवकाळी पावसाचा फटका लोकल सेवेला मोठ्या प्रमाणात बसलाय. मुंबईत लोकल सेवा 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे.  मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे अनेक भागात दृश्यमानता कमी आहे. त्यामुळे गाड्या उशिराने धावत आहेत. गाड्या उशिराने धावत असल्याचा फटका प्रवाशांना बसलाय. गाड्या उशिराने पोहोचत असल्याने अनेकांचा आज लेटमार्क लागला आहे.

मुंबई, ठाणे, रायगड भागात वादळासह पावसाचा इशारा

पुढील 1 ते 2 तासांत मुंबई, ठाणे, रायगड भागात वादळी वारे, पावसाचा इशारा देण्यात आलाय. 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय. अरबी समुद्रात उद्भवलेल्या आर्द्र वा-यांमुळे हा पाऊस आला.

मुंबईसह उपनगरांत अवकाळी पाऊस बरसला

मुंबईसह उपनगरांत अवकाळी पाऊस बरसला. लालबाग, परळ, करी रोड, वडाळा परिसरात पाऊस पडला. याशिवाय विक्रोळी, घाटकोपर परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. पश्चिम उपनगरातही पहाटेपासून ढगांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. बोरिवली, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी या भागात पाऊस झाला. या पावसामुळे पहाटे कामावर जाणा-यांचे हाल होतायत.  मुंबईत जे जे फ्लायओव्हरवर पाणी साचलंय. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे जे जे फ्लायओव्हरवर पाणी साचलं. त्यामुळे वाहतूक देखील मंदावली. पाणी तुंबल्यामुळे या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली. अंबरनाथ, बदलापूर परिसरात अवकाळी पाऊस पडला. पहाटेपासूनच पाऊस पडतोय. या पावसामुळे सकाळी ऑफिसला जाणा-यांची तसंच शाळेत जाणा-या मुलांची तारांबळ उडाली.

ठाणे जिल्ह्यातही पावसाच्या सरी

ठाणे जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळल्या. ठाण्यात पहाटेपासूनच दमदार पाऊस झाला. पहाटे 4 वाजल्यापासूनच ठाण्यात पाऊस कोसळत होता. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह ठाण्यात पाऊस झाला. या पावसामुळे हवेत गारवा आलाय. साधारण साडेसहाच्या सुमाराला पावसाचा जोर ओसरला. मात्र अजूनही रिमझीम पाऊस सुरू आहे.

नवी मुंबईत सकाळी अवकाळी पावसाची हजेरी

नवी मुंबईत सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पहाटेपासूनच नवी मुंबईत पाऊस कोसळत होता. पहाटे ऑफिसला जाणा-यांची पावसामुळे तारांबळ उडाली.  कल्याण-डोंबिवलीतही पाऊस सुरूय. पहाटेपासूनच विजांचा कडकडाट सुरू होता. पावसामुळे सकाळी कामावर जाणा-या नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी वेळेत शाळा गाठण्यासाठी स्कूलबस, रिक्षासाठी उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांनाही पावसाचा फटका बसला. अवकाळी पावसामुळे कल्याण शहरातील सहजानंद चौक ,बेतूरकर पाडा या भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालीय. अर्ध्या तासांच्या पावसामुळेच शहराच्या अनेक भागात पाणी साचलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *