अहमदनगरमधील एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. यानंतर या लोकांनी आत्महत्या केली की हत्या झाली याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, अखेर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. या सातही लोकांची आत्महत्या नसून हत्या झाली आहे. यासाठी सुनियोजित कट रचण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिलं आहे.
पोलिसांना १८ ते २२ जानेवारी या पाच दिवसांत पारगाव हद्दीतील भीमा नदीपात्रात चार मृतदेह मिळून आले. यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. यानंतर केलेल्या शोधकार्यात तीन मुलांचे मृतदेह सापडले.
मोहन उत्तम पवार (वय ४५), त्यांची पत्नी संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), जावई शाम पंडित फलवरे (वय २८), मुलगी राणी शाम फलवरे (वय २४ वर्षे), नातू रितेश उर्फ भैय्या शाम फलवरे (वय ७), छोटू शाम फलवरे (वय ५) आणि कृष्णा शाम फलवरे (वय ३, सर्वजण रा. हातोला, ता. वाशी, जि. धाराशिव) अशी मृतांची नावे आहेत.
