ठाण्यात उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली बाईक, हवेत उडून दोन तरुण खाली कोसळले; जागीच मृत्यू

उड्डाणपुलावरून खाली पडून ठाण्यातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ठाण्यातील कासकॅसलमिल नाका येथील उड्डाणपुलावर दुचाकीने प्रवास करत असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. संरक्षण कठड्याला दुचाकी धडकून हे दोघे तरुण खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

ठाण्यातील माजिवडा येथून ठाणे स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावरून प्रवास करत असताना अपघात होऊन दोन बाईकस्वार खाली पडले आणि त्या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. MH 04 LK 4220 असा अपघात झालेल्या दुचाकीचा नंबर असून ही दुचाकी सारिका मोरे यांच्या नावावर रजिस्टर आहे. मंगळवार २४ जानेवारी पहाटे साडे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. प्रतीक मोरे (२१) आणि राजेश गुप्ता (२६) असे मयत झालेल्या दोन्ही तरुणांची नावे आहेत.प्रतीक मोरे हा ठाण्यातील रहिवाशी असून त्याचा साथीदार राजेश हा उल्हासनगरचा रहिवाशी होता. दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकी उड्डाणपुलाच्या संरक्षक कठड्याला धडकली आणि त्यानंतर दुचाकीवरील दोघे तरुण उड्डाणपुलावरुन खाली पडल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

या घटनेची माहिती मिळताच राबोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णवाहिकेतून या दोघांना प्राथमिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्या दोन्ही व्यक्तीना मयत घोषित केले आहे. या प्रकरणी राबोडी पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. हे दोघे तरुण डिलिव्हरी बॉय असल्याचे समोर आले असून या प्रकरणाचा पुढील तपास राबोडी पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *