मुंबई सायन – पनवेल मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. वाशी खाडीपूल गेल्या एकतासापासून वाहतुकीसाठी बंद झालाय. या पुलावर वाळूचा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाळू रस्त्यावर पसरल्याने वाशीचा खाडीपूल मागील एक तासापासून बंद आहे. यामुळे मुंबईला जाणाऱ्या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास 3 किमी इतक्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
सकाळी रेती घेऊन जाणारा ट्रक वाशी खाडी पुलावर पलटी झाल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे. घटनास्थळी वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. JCB च्या साहाय्याने रेती काढण्याचे काम सुरु आहे. यासाठी पाण्याचा फव्वारा मारुन अग्निशमन दल देखील रस्ता मोकळा करण्याचे काम करत आहे. पुढील काही वेळात रस्ता मोकळा होऊन वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती वाहतूक पोलीस देत आहेत.
दुचाकीस्वारांनो काळजी घ्या !
वाशी उड्डाणपुलावरुन पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर धोका वाढला आहे. पुलावर वितळलेल्या डांबराचे उंचवटे धोकादायक झाले आहेत. त्यामुळे अपघाचा धोका वाढला आहे. पावसाळ्यातील खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेले डांबर वितळून त्यात टाकलेली छोटी वाळू वर आली आहे. त्यामुळे गाडी स्लीप होण्याचा धोका आहे. वाशी टोलनाका चालवत असलेल्या एमईपी कंपनीकडून वाशी उड्डाणपुलावर डांबर आणि वाळू मिश्रण करुन खड्डे बुजवण्यात आले. पण त्याचा त्याचा आता धोका वाढला आहे.
नवी मुंबई महापालिकेकडे वाशी उड्डाणपूलची देखभाल रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेची आहे.त्यामुळे पालिकेने या उड्डाणपुलावरील धोकादायक उंचवटे दूर करावेत, अशी मागणी होत आहे.
