मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी ठिकठिकाणी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. १५ मे पर्यंत गाळ काढण्याचे टार्गेट दिले आहे. मुंबईत पाणी तुंबणार नाही, असेच काम करण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही चहल यांनी यावेळी दिली.
बीकेसी इथल्या मिठी नदीत सुरु असलेल्या नालेसफाई कामांची त्यांनी पाहणी केली. कामावर देखरेख ठेवण्यासाठी आयुक्तांनी प्रत्येक झोनमध्ये दोन भरारी पथकांची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे नेते गेल्या आठवडाभर नालेसफाई कामांची पाहणी करुन टीकेची झोड उठवत होते. यंदा तरी पावसाळ्यात मुंबई तुंबणार नाही, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
मुंबईकरांना दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबल्याने त्रासाला सामोरे जावे लागते. पाणी तुंबण्याची समस्या दूर करण्यासाठी दरवर्षी नालेसफाई आणि इतर उपाययोजना केल्या जातात. पण तरी देखील पाणी तुंबते. कोट्यवधी रुपये खर्च करुनही यावर तोडगा निघत नाही.
