मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. मात्र, मागणीअभावी सर्व फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१३ मार्च) राज्य तसेच परराज्यातून मिळून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवडय़ात फळभाज्यांची आवक १०० ट्रक एवढी झाली होती. मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ७ ते ८ ट्रक हिरवी मिरची, मध्य प्रदेशातून १० ट्रक मटार, राजस्थानातून ६ ते ७ ट्रक गाजर, गुजरात, मध्यप्रदेशातून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, कर्नाटकातून २ गोणी तोतापुरी कैरी, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० ते २० ट्रक लसूण, आग्रा, इंदूर, गुजरात तसेच स्थानिक भागातून मिळून ३० ते ३५ ट्रक बटाटा अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून सातारी आले ८०० ते एक हजार गोणी, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ४ ते ५ टेम्पो, गवार २ ते ३ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो १० ते १२ हजार पेटी, शेवगा १०० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा १२५ ट्रक अशी आवक बाजारात झाली.
पालेभाज्यांच्या दरात वाढ
मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोिथबीर, मेथी, चाकवत, करडई, पुदिना, मुळा, पालक, हरभरा गड्डी या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. शेपू, कांदापात, अंबाडी, राजगिरा, चुका, चवळईचे दर स्थिर आहेत. बाजारात कोिथबिरीच्या ८० हजार जुडी, मेथीच्या ४० हजार जुडींची आवक झाली. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत घाऊक बाजारात कोिथबीर, मेथी, पुदीना या पालेभाज्यांच्या दरात जुडीमागे दोन रुपये तसेच चाकवत, करडई, पालक, मुळा आणि हरभरा गड्डीच्या दरात एक रुपयांनी वाढ झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.
संत्री, लिंबे महाग
घाऊक फळबाजारात पपई, डाळिंबाच्या दरात घट झाली आहे. मागणी वाढल्याने लिंबांच्या गोणीमागे १०० रुपयांनी तसेच संत्र्यांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. किलगड ४० ते ५० टेम्पो, अननस ७ ट्रक, मोसंबी २५ ते ७० टन, संत्री ३० ते ३५ टन, लिंबे अडीच ते तीन हजार गोणी, पेरू ३०० ते ४०० क्रेट्स (प्लास्टिक जाळी), चिकू तीन हजार खोकी, खरबूज २५ ते ३० टेम्पो, द्राक्षे ५० ते ६० टन अशी आवक फळबाजारात झाली.
मासळी तेजीत; चिकनच्या दरातही वाढ
बाजारात मासळीची आवक मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणावर होत असून दर तेजीत असल्याची माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीतील मासळी ४०० किलो, नदीतील मासळी ५०० ते ७०० किलो, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची एकूण मिळून १५ ते १८ टन आवक झाली. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत चिकनच्या दरात किलोमागे १० रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी अभावी गावरान अंडय़ांच्या दरात शेकडय़ामागे ३० रुपयांनी घट झाली आहे, तसेच इंग्लिश अंडय़ांचे दर शेकडय़ामागे पाच रुपयांनी वाढले आहेत, असे चिकन व्यापारी रूपेश परदेशी यांनी सांगितले. मटणाचे दर स्थिर असल्याचे मटण व्यापारी प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.