आता तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुमची गच्ची कुलूपबंद ठेवू नका, तुमच्या गच्चीला कुलूप लावू नका, असं सांगण्यामागे फार मोठं कारण आहे. जानेवारी महिन्यात मुंबईतल्या ताडदेवमध्ये लागलेल्या आगीच्या धुराचे हे लोट. सचिनम इमारतीला लागलेल्या या आगीनं तब्बल 9 जणांचा जीव घेतला. मात्र आगीची ही दुर्घटना मोठा धडा शिकवून गेली, तो म्हणजे तुमची गच्ची कुलूपबंद ठेवू नका.
सचिनम इमारतीला लागलेली आग आणि त्यात झालेल्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीनं ही महत्त्वाची शिफारस केली आहे.
तुमची गच्ची कुलूपबंद ठेवू नका
आग लागते त्यावेळी सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी गच्चीचा आधार असतो. मात्र बऱ्याचदा गच्ची कुलूपबंद असल्यानं गच्चीवर पोहोचण्यात अडथळे येतात. आगीत गुदमरायला होतं, अशा वेळी मोकळ्या हवेत जाणं महत्त्वाचं ठरतं. त्याचबरोबर गच्चीवरुन सुटका करणंही सोपं जातं. त्यामुळे तुमची गच्ची कुलूपबंद ठेवू नका. किंवा कुलूप लावलंच तर चावी दरवाजाच्या जवळच ठेवा.
बऱ्याचशा इमारतींमध्ये सुरक्षेच्या कारणामुळे गच्चीला कुलूप लावलं जातं. मात्र त्यापेक्षा गच्चीवर देखरेख करण्यासाठी सीसीटीव्हीचा पर्याय उलपब्ध आहे.
आग लागलेल्या सचिनम अपार्टमेंटची गच्ची बाहेरून बंद होती. त्यामुळे तिथले रहिवासी प्रयत्न करुनही गच्चीवर पोहोचू शकले नाहीत, आणि घरातच गुदमरले. याआधीही मुंबईत अशा दुर्घटना घडल्या आहेत. आग सांगून लागत नाही,ती अचानक लागते. त्यामुळे खबरदारी घ्या आणि गच्ची कुलूपबंद ठेवू नका.
