आता एसटीतील अधिकृत संघटनांचा पगारवाढीतील तफावतीवर आक्षेप आहे. एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ आता संघटनांना मान्य नाही, असे दिसून येत आहे. याबाबत लवकरच या संघटना परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाशी चर्चा करणार आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसह अन्य काही मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले. त्यानंतर राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. तसेच 41 टक्के पगारवाढ देण्यात आली. आता एसटीतील अधिकृत संघटनांना पगारवाढीबाबत काही आक्षेप आहेत.
नवीन भरती झालेल्यांचे पगार जास्त वाढवलेत, तर जुन्या कर्मचाऱ्यांचे पगारात कमी प्रमाणात वाढ देण्यात आली आहे. तसेच नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना 7 हजार 200 रुपयांची पगारवाढ तर 20 आणि 30 वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना 3 हजार 600 रुपयांची पगारवाढ देण्यात आली आहे. एसटीतील अधिकृत संघटनांचा या पगारवाढीतील तफावतीला आक्षेप आहे. याबाबत लवकरच या संघटना परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. त्यातच काही कर्मचारी आजही संपावर ठाम आहेत.
