उपचारातील हलगर्जीबद्दल डॉक्टरांना २८ लाखांचा दंड

डोंबिवलीतील एका महिलेच्या गर्भाशयात गाठ असल्याने त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढण्यात आले होते. मात्र,शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या दोन्ही मूत्रनलिकांना गंभीर इजा झाली. याची कल्पना रुग्णाला न देता किंवा त्यावर वेळेत कोणताही उपचारन केल्याने रुग्ण महिलेचे मूत्राशय निकामी झाले. त्यामुळे या महिलेच्या जिवावर बेतण्याची वेळ आली होती. याप्रकरणी हलगर्जीचा ठपका ठेवून ग्राहक न्यायालयाने डोंबिवलीतील दोन डॉक्टरांना २८ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. महिनाभरात दंड न भरल्यास १२ टक्के व्याजासह नुकसानभरपाई द्यावी लागेल, असे आदेशही ग्राहक न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे गेली १० वर्षे न्यायासाठी झगडणाऱ्या डोंबिवलीकर श्रेया निमोणकर यांना दिलासा मिळाला आहे. श्रेया निमोणकर या नोव्हेबर २०१०मध्ये मासिकपाळीच्या त्रासावरील उपचारासाठी डॉ. सीमा शानभाग यांच्या क्लिनिकमध्ये तपासणीसाठी गेल्या. यावेळी डॉक्टरांनी गर्भाशयात असलेली गाठ कॅन्सरची असल्याची भीती व्यक्त करून त्यांना तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. यानंतर डोंबिवलीतील डॉ. शानभाग व नवी मुंबईतील डॉ. उज्ज्वल महाजन यांनी निमोणकर यांच्यावर शस्त्रक्रिया केली. मात्र, यासाठी आपली परवानगी न घेता किंवा शस्त्रक्रियेतील धोके समजावून न देताच ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा निमोणकर यांचा आरोप आहे. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या दोन्ही मूत्रनलिकांना इजा झाल्याने त्यांचे मूत्राशय निकामी झाले. मात्र, शस्त्रक्रियेत चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतरही ते रुग्णापासून लपून ठेवल्याचे गंभीर निरीक्षण या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने नोंदवले. याप्रकरणी सर्व बाजूंनी सुनावणी झाल्यानंतर २१ ऑक्टोबरला न्यायालयाने दिलेल्या निकालात शस्त्रक्रियेत हलगर्जीचा ठपका ठेवत, रुग्णाच्या जिवाशी खेळ केल्याबद्दल दोन्ही डॉक्टरांना २८ लाख ५० हजाराचा दंड ठोठावला. याप्रकरणी डॉ. उज्ज्वल महाजन यांनी सांगितले की, न्यायालयाच्या निकालाची प्रत अद्याप प्राप्त झालेली नसून, त्यानंतर अपिलात जाण्याबाबत विचार करू. अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर डॉ. सीमा शानभाग यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्या प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाल्या नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *