दोन बहिणी, एक लहान भाऊ, त्यांच्या शिक्षणाचा खर्च, त्यातच शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न. आईवडिलांवर आपले ओझे नको म्हणून सेजल गोपाल जाधव, या १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ही घटना कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छिदवडी या गावात उघडकीस आली आहे. तिने मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीतून आत्महत्येचे कारण समोर आले आहे. ‘आईवडिलांना ओझे नको म्हणून मी हे जीवन संपवत आहे’, असे लिहून सेजलने आपली जीवनयात्रा संपवली. सेजलचा गळफास लावलेला मृतदेह आढळून आला. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सेजलने आपल्या भावना व्यक्त के ल्या आहेत. वडिलांना शेतमजुरी व तीन एकर शेती करून उदरनिर्वाह करावा लागतो. त्यात सतत होत असलेली नापिकी व घरातील आर्थिक परिस्थितीमुळे आयुष्य जगणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यात दोन बहिणी, एक लहान भाऊ अशा सर्वाच्या पोटापाण्याचा आणि भविष्याचा बिकट प्रश्न आहे. सध्याची महागाई आणि मुलांचे शिक्षण हे सर्व करीत असताना आपल्या आईवडिलांची प्रचंड ओढाताण होत आहे. त्यांना अतोनात त्रास होत आहे. त्यामुळे कु टुंबावरील माझे ओझे कमी व्हावे, म्हणून मी आपले जीवन संपवत आहे, असे लिहून सेजलने टोकाचे पाऊल उचलले. गरिबीला कंटाळून या मुलीने आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळी पंचनामा करीत असताना मृतदेहाजवळ एक चिठ्ठी मिळाली. तिचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून तपास सुरू असल्याचे कुऱ्हा पोलिसांनी सांगितले.
