जुने कपडे, चिंधी विक्री करतानाच आपल्या संभाषण चातुर्याने बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दागिने लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आग्रीपाडा पोलिसांनी आवळल्या. पोलिसांनी ठाण्यात राहणाऱ्या तिघांना अटक केली असून त्यांनी अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना फसवल्याचे तपासातून समोर आले आहे.
पोलिस असल्याची बतावणी करून पुढे नाकाबंदी आहे, हत्या झाली आहे तसेच श्रीमंत व्यक्ती साड्या वाटत आहे अशी वेगवेगळी करणे पुढे करून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना लुटण्याचे प्रमाण मुंबईत वाढले आहे. अशातच भायखळा येथील ६५ वर्षीय महिला मंदिरात दर्शनासाठी जात असताना तीन तरुणांनी त्यांना थांबवले. वेगवेगळी कारणे सांगून त्यांनी या महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवत मोठ्या चलाखीने तिच्याकडील अडीच लाखांचे दागिने घेऊन पोबारा केला. या महिलेने आग्रीपाडा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता आणि तीन आरोपी असल्याने आग्रीपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम कोरेगांवकर यांनी सहायक निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक अभिजित टेकवडे, गालांगे यांच्यासह मंडलिक, खानविलकर, चरंडे, गोडसे, शिंदे, रणदिवे, खरात यांची पथके तयार करून तपास सुरू केला.
