खाद्यसंस्कृती हा एक असा घटक आहे, जिथं सगळे मतभेद सर्व मतमतांतरं धुसर होतात आणि सारेजण एकत्र बसून खाण्याचा आनंद घेतात. राजकीय असो किंवा मग आणखी कोणत्या क्षेत्रातील व्यक्ती, खाण्याच्या आवडीनिवडी सांगताना प्रत्येकामध्ये दडलेलं कुतूहलपूर्ण लहान मुल हळूच बाहेर डोकावतं आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. असाच धक्का दिला आहे, महाराष्ट्राचे सर्वात तरुण मंत्री आदित्य ठाकरे यांनी.
मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं नुकतंच वर्षा या निवासस्थानी टीव्ही होस्ट कुणाल विजयकर यांनी नुकतीच हजेरी लावली होती. खास क्षणांचं औचित्य साधत कुणालला थेट मुख्यमंत्र्यांच्या घरच्या मेजवानीच चव चाखण्याची संधी मिळाली.
आदित्य ठाकरे यांनी कुणालसाठी जेवणाचा सारा बेत आखत जेवणाच्या टेबलवर त्यांच्याशी गप्पांचा फड रंगवत या मेजवानीचा आस्वाद घेतला. अळूवडी, मिरची वडा, भजी, पापड, वरणफळं, वरण भात, पीठलं, भाकरी, भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी, मोदक, पूरणपोळी, भरली मिरची, लोणचं आणि वरण भातावरुन सोडलेली साजूक तुपाची धार असं एकंदर ताट मुख्यमंत्र्यांच्या घरात कुणाल विजयकरच्या समोर करण्यात आलं. बस्स, मग काय जेवणाच्या गप्पा आणि जीभेवरुन रेंगाळत जाणारी प्रत्येक पदार्थाची चव, हाच एक सिलसिला तिथं पाहायला मिळाला.
मुख्यमंत्र्यांच्या घरात जेवणाच्या सवयी कशा, इथं मोजकं खाण्याकडे कुणाचा कल आहे का या साऱ्याचा उलगडा झाल्याचं पाहायला मिळालं. ‘खाने मे क्या है…’च्या निमित्तानं गणेशोत्सवादरम्यान, खाण्याच्या बाबतीत कॅलरीजचं गणित जरा लांबच असतं असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. सोबतच त्यांनी यावेळी त्यांच्या महाविद्यालयापासून ते अगदी मुंबई, महाराष्ट्रात कोणत्या भागात कोणता पदार्थ चांगला मिळतो याचाही उलगडा केला. ज्यामुळं त्यांच्यातील खवय्या सर्वांची मनं जिंकून गेला.
