गेल्या काही दिवसांपासून जिजामाता उद्यान मधील पेंग्विनवर होणाऱ्या खर्चाबाबत चर्चा सुरू आहेत. याप्रकरणी BMC ला विरोधी पक्षांनी धारेवर धरले असून, भाजप आमदार नितेश राणे यांनी याप्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहले आहे. ‘कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय?’ असा खोचक सवाल नितेश यांनी लिहलेल्या पत्रात विचारण्यात आला आहे. पत्रात राणे यांनी नक्की काय लिहलंय जाणून घेऊ या.
मुंबईकरांची दिशाभूल
आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. ही सन्मानाची बाब असली पाहिजे. पण आपण घेतलेल्या प्रेस कॅान्फरन्समध्ये ज्या पद्धतीने आपण मुंबईकरांची दिशाभूल केलीये, हे अत्यंत निंदनीय आहे. असो, आम्हीही समजू शकतो की ‘पेंग्वीन’च्या दबावामुळे आपण खोट्याला खरं सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला, महापालिकेने प्रकाशित केलेल्या आकडेवारीप्रमाणे पर्यटकांची संख्या २०१७ ते २०१८ या आर्थिक वर्षात १७ हजार ५७ हजार ०५९ होती पण मागील दोन वर्षांमध्ये पर्यटकांचा आकडा कमी झाला, आता ती संख्या १० लाख ६६ हजार ०३६ वर आलीय. त्यामुळे तीन वर्षांत सात लाख पर्यटकांची संख्या घटलेली आहे.
पंधरा कोटीचा पेंग्वीन देखभालीचा ठेका
मुळात महसूल वाढला म्हणून आकर्षण वाढले. असा भ्रमीत करण्याचा प्रयत्न आपण केला. पण वास्तवामध्ये २०१० पर्यंत या राणीबागेतील प्रवेश शुल्क हे ५ रुपये होते. पण त्यानंतर हे शुल्क आपण ५ रूपयांवरून थेट ५० रूपयांवर नेलं. दोन प्रौढ आणि बारा वर्षाखाली दोन मुले आदींसाठी १०० रुपये आणि एका प्रौढ व्यक्तीला ५० रुपये अशाप्रकारचे अजब शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे जो महसूल वाढलेला आहे, तो या वाढीव शुल्कामुळे आहे पर्यटकांची संख्या किंवा आकर्षण वाढल्याने नाही.
लहान मुलांची हट्टाची जागा हिरावली
राणीचा बाग हा सामान्य मुंबईकर कुटुंबातील लहान मुलांसाठी आईवडीलांकडे हट्ट करून जाण्याचे ठिकाण होते. पण एका ‘पेंग्वीन’च्या बालहट्टामुळे त्यांचे हक्काचे खेळण्याचे-विरंगुळ्याचे स्थानही आपण अव्वाच्या सव्वा तिकीट दर लावून हिरावून घेतले.
इतकेच नाही तर लहान मुलांना पाहता यावं म्हणून हा पेंग्विन कक्ष बनवला पण मुंबईतील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करताना राणीबागचे दरवाजे मुलांसाठीट खुले केले गेले नाहीत मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय? हे तरी सांगा. असा खोचक सवाल नितेश राणे यांनी महापौरांना केला आहे.

