दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काल दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशमध्ये कारवाई करत 6 संशयीत दहशतवाद्यांना अटक केली. यापैकी एक जान मोहम्मद शेख हा मुंबईतल्या धारावी (Dharavi) इथं राहणार आहे. याबाबत राज्याचे एटीएस प्रमुख विनीत अगरवाल यांनी पत्रकार परिषद घेत जान मोहम्मद शेख याच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. जान मोहम्मद शेखचे गेल्या 20 वर्षांपासून डी-कंपनीशी (D-Company) संबंध असल्याची माहिती एटीएस प्रमुखांनी दिली. तो एटीएसच्या रडावर होता अशी माहितीही त्यांनी दिली.
जान मोहम्मदला 9 तारखेला दिल्लाला जाण्याचं ठरवलं होतं. 10 तारखेला त्याने तिकिटासाठी ट्रॅव्हल एजंटला पैसे ट्रान्सफर केले. पण त्याचं तिकिट कन्फर्म झालं नाही, यानंतर त्याने 13 तारखेला गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ट्रेनसाठी त्यानं वेटिंग तिकीट घेतलं. संध्याकाळपर्यंत त्याचं तिकीट कन्फर्म झालं. तो एकटाच तिथून ट्रेनने निघाला. ट्रेन कोटाला पोहोचली, तेव्हा त्याला दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली, अशी माहिती एटीएस प्रमुखांनी दिली.
अटक करण्यात आली त्यावेळी जान मोहम्मद शेख याच्याकडे कोणतंही शस्त्र नव्हतं. त्याला का अटक करण्यात आली हा तपासाचा भाग असून महाराष्ट्र एटीएसची टीम दिल्लीला रवाना होणार आहे. तिथे जान मोहम्मदची चौकशी करण्यात येईल, आमची माहिती आम्ही दिल्ली पोलीसांना देऊ, दिल्ली पोलीसांची माहिती आम्ही घेऊ असं एटीएस प्रमुखांनी म्हटलं आहे.
या दहशतवादी कृत्याबाबत पूर्व कल्पना केंद्रीय यंत्रणांना होती. त्यांनी ती दिल्ली पोलिसांना दिली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती विनीत अगरवाल यांनी दिली.
जान शेखची आर्थिक परिस्थिती ठिक नव्हती. त्याला पैशाची गरज होती. त्याने कर्ज काढून टॅक्सी घेतली होती, कर्ज परतफेड करून शकला नाही. पैशांसाठीच तो यात सहभागी झाल्याची शक्यता असून अधिक तपास सुरु असल्याचे एटीएस प्रमुखांनी सांगितलं.
