साताऱ्यात कास पठारावर रानगव्यांचा मुक्त संचार

साताऱ्यात कास पठारावर रानगव्यांचा मुक्त संचार

कास पठारावर फुलोत्सवात सहभागी होण्यासाठी पठारावरचा निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असताना या पठारावर कायमचे रहिवासी असलेले रानगव्यांनी पठारावर कळपाने गर्दी केली आहे. इतर वेळी अजून मधून दर्शन देणारे गवे मागील काही दिवसात गव्यांचा मोठा कळपाने पठारावर खुल्या माळरानात रस्त्याने फिरताना पर्यटकांना आढळून येत आहेत.

कास पठार खुले झाल्यामुळे कास पठारावरील फुलोत्सव पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहेत. आत्तापर्यंत किमान वीस हजार पर्यटकांनी या परिसराला भेट दिली आहे. यातच पावसाने संततधार सुरू केल्याने पठारावरील फुलोत्सव थोडा लांबला असला तरी पाऊस थांबताच सूर्यप्रकाश (उन्हे) मोठ्या प्रमाणात येईल. फुलांचे गालिचे तयार व्हायला वेळ लागणार नाही, असा येथील बुजुर्गांचा अनुभव आहे. एकदा कडक व अधून मधून परंतु स्पष्ट सूर्यप्रकाश सुरू झाला कि फुलांचे गालिचे तयार होतील. या परिसरात सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे आणि धुक्यामुळे पठार अद्यापही सुनेसुने आहे. मात्र अधूनमधून पर्यटकांच्या भेटीला येणारे गवे यावेळी कळपाने पठारावर मोकळ्या जागेत फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पर्यटकांना याठिकाणी अतिशय आगळावेगळा अनुभव येत आहे.

पर्यटकांनी या गव्यांना कोणीही भीती घालू नये, दगड मारू नये, हुसकावून लावण्याचा प्रयत्न करु नये, असे वन विभाग आणि ग्रामस्थांनी सांगितले. त्यांना त्यांच्या मार्गाने पुढे जाऊ द्या. ते शांतपणे निघून जातात असेही त्यांनी सांगितले आहे. या गव्यानां त्रास दिल्यास ते हल्ला करू शकतात, असे कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष मारुती चिकणे त्यांनी सांगितले.

सलग सुट्ट्यांमुळे कास परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी आहे. आम्ही मागील आठवड्यातील सलग सुट्ट्यांमध्ये मुद्दाम पठारावर आलो होतो. मुसळधार पाऊस प्रचंड धुके आणि सोसाट्याच्या वार्‍यात पठारावर फुले पाहता आली नाहीत तसेच या परिसरात जाणे थोडे आव्हानात्मक असल्याचा अनुभव आला. फुले येण्यासाठी अजून बराच वेळ असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे मात्र येथील निसर्ग खूपच चांगला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *