लोणावळा शहर आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून अचानकपणे गुरांची संख्या घटू लागलीय. गुरं गायब झाली कुठे? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता. मात्र आता त्याचा उलगडा झालाय. गुरांच्या तस्करीसाठी एक टोळीच सक्रिय झालीय. या टोळीची मोडस ऑपरेंडी पाहिल्यानंतर पोलिसही चक्रवून गेलेय. नेमका हा सर्व प्रकार काय आहे, या मागे कोणाचा हात आहे, हे जाणून घेऊयात.
गेल्या काही दिवसांपासून लोणावळा शहरातील गायी आणि वासरं अचानकपणे गायब होऊ लागलीयेत. सुरूवातीला कुणाला याचं फारसं गांभीर्य वाटलं नाही मात्र गुरं चोरणा-या टोळीचा कारनामा समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.
हे कुणी प्राणीप्रेमी नाहीत. गुरांना खायला देण्याच्या निमित्तानं ही व्यक्ती त्यांच्याजवळ जाते आणि भुलीचं इंजेक्शन देते.ही टोळी भटक्या जनावरांना आपलं लक्ष्य करतेय. भूलीचं इंजेक्शन दिल्यानंतर या जनावरांना गाडीत भरलं जातं. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर गुरं पळवणा-या टोळीविरोधात लोणावळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
लोणावळा आणि आजुबाजूच्या ग्रामीण भागात ही टोळी सक्रिय झालीय. अशा प्रकारे भुलीचं इंजेक्शन देऊन त्यांनी अनेक जनावरं पळवली आहेत. ही जनावरं कत्तलखान्यात नेली जात असावीत असा संशय स्थानिकांनी व्यक्त केलाय. आता पोलिसांनी या टोळीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी हीच अपेक्षा.

