अन्य समुद्रांपेक्षा हिंदी महासागराची जलद गतीने तापमानवाढ होत असून येत्या काही दशकांत भारतात उष्णतेच्या लाटा येतील आणि पूरपरिस्थितीलाही तोंड द्यावे लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या जागतिक अहवालात सोमवारी देण्यात आला.
पृथ्वीचे तापमान वाढत असल्याने कोणकोणते जागतिक दुष्परिणाम संभवतील, याबाबतचा संयुक्त राष्ट्रांच्या ‘इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेन्ज’ (आयपीसीसी)चा सहावा अहवाल ‘क्लायमेट चेंज २०२१ – दी फिजिकल सायन्स बेसिस’ सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यात भारताबद्दल गंभीर इशारा देण्यात आला आहे. हिंदूी महासागराच्या तापमानवाढीमुळे समुद्रपातळीत वाढ होऊन किनारपट्टीच्या सखल भागांमध्ये वारंवार तीव्र पूरपरिस्थिती उद्भवेल, असे या अहवालात म्हटले आहे.
भारतासारख्या देशांमध्ये वायूकणांच्या (एरोसोल) उत्सर्जनामुळे उष्णतेच्या लाटा निर्माण होतात. त्यामुळे वायूकणांचे उत्सर्जन कमी करणे हवेच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचे आहे, असे फ्रेडीरिक ओट्टो या हवामानशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले. ओट्टो या ‘आयपीसीसी’चा अहवाल तयार करणाऱ्यांपैकी एक आहेत. उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ होण्याबरोबरच, अतिवृष्टी आणि हिमनद्यांचे वितळणे हेही परिणाम भारतासारख्या देशाच्या बाबतीत संभवतात. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे उष्णकटिबंधीय चक्रीवादळे ़किनारपट्टय़ांवर पूरपरिस्थिती निर्माण करतील. सागरी तापमानवाढीचा हा परिणाम थोपवणे अशक्य आहे, असेही ओट्टो यांनी नमूद केले.
‘आयपीसीसी’ अहवालाच्या आणखी एक लेखिका आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजीच्या शास्त्रज्ञ स्वप्ना पॅनीकल यांनीही, समुद्राच्या पातळीतील सुमारे ५० टक्के वाढ तापमानवृद्धीमुळे होते, असे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, ‘‘हिंदी महासागराच्या प्रदेशात जास्त प्रमाणात तापमानवाढ होत आहे. याचा अर्थ या प्रदेशातील समुद्र पातळीदेखील वाढू शकते. त्यामुळे, किनारपट्टीच्या प्रदेशांना २१ व्या शतकात समुद्राची पातळी वाढताना दिसेल. ही पातळीवाढ वारंवार होताना आढळेल आणि सखल किनारपट्टी भागात पूरपरिस्थिती उद्भवण्याबरोबरच किनारपट्टीची धूपही होईल.’’ समुद्राच्या पातळीत तीव्र वाढीच्या घटना पूर्वी १०० वर्षांत एकदा घडत, परंतु या शतकाच्या अखेरीस त्या प्रत्येक वर्षी घडू शकतात, असा इशाराही पॅनीकल यांनी दिला.