महाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाउन कायम?; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लॉकडाउन लावण्यात आला आहे. ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत. एकीकडे राज्य करोनाच्या संकटाला सामना देत असताना दुसरीकडे तौते चक्रीवादळाच्या निमित्ताने अजून एका संकटाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान पावसाळा तोंडावर आला असताना सरकारसमोरील आव्हानं वाढण्याची शक्यता असून लॉकडाउन वाढणार की उठवणार हे पाहावं लागेल. राज्याचे पर्यावरण मंत्री यांनी लॉकडाउनवर भाष्य केलं आहे. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येवर हे सर्व अवलंबून असेल. राज्यात चाचण्यांची संख्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत असून प्रत्येकाने चाचणी करावी यासाठीही पुढाकार घेत आहोत. करोना रुग्णसंख्या किती आहे यावरच लॉकडाउन उठवला जावा की वाढवला जावा हे अवलंबून असेल. आरोग्य आणि सुरक्षा आमची प्राथमिकता असणार आहे,” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “लॉकडाउन असला तरी राज्यात महत्वाची कार्यालयं, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरु आहे. पण तुम्ही अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर कधी पडणार असं विचारत असाल तर ते पूर्पणे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे”.

आदित्य ठाकरे यांनी लसीकरण मोहिमेवरही भाष्य केलं. “आम्ही राज्यासाठी जास्तीत जास्त लस मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. जागतिक स्तरावरही प्रयत्न सुरु आहेत. जर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकणाऱ्या तिसऱ्या लाटेला रोखायचं असेल तर जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करुन त्यांना सुरक्षित करावं लागेल,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.

“महाराष्ट्रात सर्वात जलद गतीने लसीकरण होत आहे. आम्ही आतापर्यंत दोन कोटी लोकांचं लसीकरण केलं आहे. लसीकरणासाठी सर्व गोष्टी व्यवस्थित जागेवर असून जास्तीत जास्त पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न आहेत. ग्रामीण भागात जास्त लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी लसीसकरण करण्याचं आव्हान सध्या आमच्यासमोर आहे,” असं आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *