लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांना प्रभू रामाचे नाव लिहिण्याची शिक्षा

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाउन लावण्यात आला आहे. तरीही काही नागरिक लॉकडाउनच्या नियमाचं उल्लघंन करत रस्त्यावर फिरत आहेत. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात लॉकडाउनचे नियम तोडणाऱ्या नागरिकांना शिक्षा देण्यासाठी एका पोलीस उपनिरीक्षकाने नविन शक्कल लढवली आहे.

मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात पोलीस लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून कागदावर ‘रामा’चे नाव लिहून घेत आहेत. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीकडून चार ते पाच पानांवर रामाचे नाव लिहून घेतले जाते त्यानंतर त्याची सुटका करण्यात येते असे सतना जिल्ह्यातील कोलगवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष सिंह यांनी सांगितले. पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये नियम मोडणाऱ्या नागरिकांना पकडून ३० ते ४० मिनिटे त्याच्यांकडून रामाचे नाव लिहून घेतण्याचा उपाय सुरु केला आहे.

जिल्ह्यात करोना कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करण्यासाठी २० चेक पॉईंट्स तयार करण्यात आल्याचे उपनिरीक्षक संतोष सिंह यांनी सांगितले. ही शिक्षा देण्यासाठी जवळच्या नागरिकांनी त्यांना काही वह्यासुद्धा दिल्या आहे.

“यापूर्वी आम्ही नियम मोडल्याची शिक्षा म्हणून उठा बश्या काढायला सांगत किंवा तासभर बसून नंतर सोडून देत असत. मला वाटले की ते नुसते बसण्यापेक्षा त्याऐवजी भगवान रामाचे नाव लिहू शकतात. त्यामुळे आम्ही ही शिक्षा सुरू केली. त्यानंतर बाहेर फिरणाऱ्यांना आम्ही घरात बसून पालकांची काळजी घेण्याची सक्त ताकीद देतो”, असे संतोष सिंह यांनी सांगितले.

आतापर्यंत कोणावरही या शिक्षेची जबरदस्ती केली नसल्याचे त्यांनी सांगितले. हा उपाय कोणाच्याही धार्मिक श्रद्धेच्या विरोधात नाही. लोक त्यांच्या इच्छेने लिहितात. गेले ३ दिवस आम्ही हा उपाय राबवत आहोत. आतापर्यंत जवळपास २५ लोकांना ही शिक्षा झाली आहे. तसेच याबद्दल आम्हाला कोणही तक्रार केलेली नाही, असे सिंग म्हणाले.

मध्य प्रदेशात वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे १७ मे पर्यंत जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. याआधी राज्यात लॉकडाउन वाढवण्याचे संकेत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *