ठाण्याच्या शंभर एकरात काळ्या भाताचे उत्पादन

पारंपारिक शेतीकडून प्रयोगशील उत्पादन घेण्याचा प्रयत्न आता ठाणे जिल्ह्यातील शेतकरी करू लागले असून यंदा उन्हाळी हंगामात शंभर एकर जागेत काळ्या भाताचे उत्पादन घेण्यात आले आहे. या लागवडीतून एक हजार क्विंटल काळ्या भाताचे बियाणे उपलब्ध झाले असून त्यापासून येत्या खरीप हंगामात अडीच हजार हेक्टर क्षेत्रात काळ्या भाताची लागवड होणार आहे. अलीकडेच पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

राज्यातील सर्वाधिक शहरीकरण झालेला जिल्हा अशी ठाण्याची ओळख असली तरी ग्रामीण भागातील बहुतेक कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. ठाणे जिल्ह्यात १ लाख ४१ हजार शेतकरी असून मुख्यत: खरीप हंगामात ते भात पिक घेतात. ठाणे जिल्ह्यातील ५६ हजार ६०० हेक्टर जागेत भात पीक घेतले जाते. मात्र, त्याचबरोबरीने गेल्या काही वर्षांत भाजीपाला आणि फळझाडे लागवडीतून अधिक उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न स्थानिक शेतकरी करू लागले आहेत. गेल्या वर्षी अतिपावसाने हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे नुकसान झाले. ७३ हजार ३५० शेतकऱ्यांचे ३८ हजार ९२ हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे नुकसान झाले. त्यावर उपाय म्हणून भात पिकाच्या जोडीनेच अन्य नगदी पिके घेण्याचा प्रयत्न शेतकरी करू लागले आहेत. मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यातील एक हजार शेतकoयांनी निर्यातक्षम भेंडी उत्पादन करण्यासाठी नोंदणी करून २ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावर भेंडी लागवड केली. भविष्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक नगदी पिके घ्यावीत यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली. बांधावरील तूर लागवडीच्या मोहीमेला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. पुढील हंगामात पाच हजार हेक्टर क्षेत्रात तूर लागवड केली जाणार आहे.

पारंपारिक भात पिकापुरत्या मर्यादित शेतीची चाकोरी मोडून जिल्ह्यातील शेतकरी आता अन्य पिके घेऊ लागला आहे. काही शेतकरी पावसाळ्यानंतर कडधान्य लागवड करतात. शेजारील शहरातील बाजारपेठेत त्यांनी पिकविलेल्या भाजीपाल्यास चांगली मागणी असते. त्यातून त्यांच्या हाती अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे मजुरीसाठी स्थलांतर करणे आता कमी झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *