पाडव्याच्या मुहूर्तावर हापूसच्या दरात घसरण

गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी सोने, नवीन सामानखरेदीचा मुहूर्त जसा साधला जातो, तसाच फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याच्या व्यापारासाठीही गोरज मुहूर्त मानला जातो. त्यामुळे पाडव्याला बाजारात सर्वाधिक आंब्याच्या पेट्या पाठवण्याची परंपरा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा मागे पडली आहे. यावर्षीही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे बाजारात पाडव्याच्या पूर्वसंध्येला कोकणातून अवघ्या २५ हजार पेट्यांचीच आवक झाली आहे. आधीच हापूस आंब्याची निर्यात कमी आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात विक्रीसाठी हा आंबा उपलब्ध आहे. त्यातच बाजारात परराज्यांतून आणि इतर ठिकाणांहून येणाऱ्या आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कोकणातील हापूस आंब्याच्या दरात घसरण झाली आहे. परिणामी, खवय्यांना पाडव्याला हापूस आंब्यांवर ताव मारता येणार आहे.

आता बाजारात कर्नाटक आंब्याचीही आवक वाढली आहे. हे आंबे हुबेहूब हापूसप्रमाणेच दिसत असल्याने त्यांची विक्रीही हापूस म्हणून काही किरकोळ व्यापारी करत असतात. मात्र घाऊक बाजारात हे आंबे किलोवर विकले जात असून त्यांचा दर १०० ते १५० रुपये किलो आहे. मात्र हा आंबाही काही वेळा पेट्यांमध्ये येत असल्याने त्याबाबत संभ्रम निर्माण होत असतो. मात्र बाजारात सध्या तरी हापूस आंब्यांनाच जास्त मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *