सांगलीत अत्यावश्यक कारणे सांगत रस्त्यावर गर्दी

भाजी किराणा व औषध खरेदी आणि बँकेतील कामाच्या निमित्ताने माणसांची वर्दळ कायम राहिल्याने पहिल्याच दिवशी सांगली, मिरजेत संचारबंदीची केवळ औपचारिकताच पाहण्यास मिळाली. लोकांनी गर्दी टाळावी यासाठी पोलीस रस्त्यावर असूनही कोणीही विचारणा करीत नसल्याने अनावश्यक गर्दी टाळण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

रात्री आठपासून संचारबंदीसह कठोर निर्बंधांची अंमलबजावणी झाली असली, तरी शहरातील अत्यावश्यक सेवा म्हणून रिक्षा वाहतूक, किराणा दुकाने, बेकरी, भाजी विक्री सुरूच होती. तसेच अत्यावश्यक कामासाठी ये-जा करण्यासाठी परवान्याची गरज नसल्याने अनेक लोक रस्त्यावर येत असल्याचे दिसून आले.

लोकांनी अकारण घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली असली, तरी फारशी विचारणा करण्यात येत नसल्याने अनेक जण अकारण किरकोळ कारण सांगून बाहेर पडत होते.

मुख्य रस्त्यावरील अनेक दुकाने बंद असली, तरी लोक भाजीसह जीवनावश्यक वस्तू आणण्याच्या निमित्ताने रस्त्यावर येत होते.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अतिरिक्त अधीक्षक मनीषा डुबुले यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही लोकांना अकारण घराबाहेर पडू नये यासाठी आवाहन करीत होते.

तर रस्त्यावरील भाजी विक्री पूर्णपणे थांबली असली, तरी अनेक विक्रेते ठरावीक ठिकाणी थांबून भाजी विक्री करीत होते. मात्र पानठेले, चहा विक्रीचे गाडे, नाश्ता सेंटर बंद राहिल्याने गर्दीला अल्पसा आळा बसला आहे.

शहरी बस वाहतूक बंद असली, तरी लांब पल्ल्याची बस वाहतूक नित्याप्रमाणे सुरू होती. शिवभोजन केंद्रावर विना मोबदला शिवथाळी पार्सल रूपात देण्यात येत होती. प्रत्येक केंद्राला १५०० शिवथाळी मोफत देण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *