कल्याण-डोंबिवलीकरांना झटका; शेअर रिक्षांची बेकायदा भाडेवाढ

कल्याण-डोंबिवली शहरात रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट सुरू असतानाच रिक्षा संघटनेने शेअर रिक्षांसाठी २ ते ३ रुपयांची भाडेवाढ जाहीर करून प्रवाशांना आणखी मोठा भुर्दंड दिला आहे. आरटीओची कोणतीही मान्यता नसताना आरटीओच्या निर्देशांनुसार भाडेवाढ केल्याचा दावा करत संघटनांनी भाडेवाढीची पत्रके प्रसिद्धीसाठी पाठवली आहेत. विशेष म्हणजे, शासन, आरटीओ यांच्याकडून कसलीच परवानगी नसताना रिक्षातून तीन प्रवाशांची वाहतूक करण्याची मुभादेखील संघटनेने रिक्षाचालकांना दिली आहे. यामुळे आता वाहतूक पोलिस आणि आरटीओ यांच्याकडून यावर कोणती कारवाई केली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात रिक्षाचालकांच्या मुजोरीचा प्रवाशांना कायमच त्रास सहन करावा लागतो. करोना लॉकडाउन काळात नियम धाब्यावर बसवून रिक्षातून तीन, चार प्रवाशांची वाहतूक करून प्रवाशांकडून दुप्पट भाडे उकळले जात होते. याबाबत प्रवाशांच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर आरटीओकडून रिक्षाचालकांना अधिक भाडे न आकारण्याच्या तसेच करोनाकाळात वाढवलेले भाडे कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही रिक्षाचालकांची मुजोरी कमी झालेली नाही.

भाडेवाढीच्या रिक्षाचालकांच्या प्रस्तावावर प्रादेशिक वाहतूक कार्यालयाकडून कोणताही निर्णय झालेला नसतानाही ठाणे जिल्हा रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेने रिक्षा चालकांची पाठराखण करताना अनधिकृत भाडेवाढ प्रवाशांच्या माथी मारण्याचा प्रयत्न चालविला आहे. कल्याण स्टेशन परिसरातून सेवा देणाऱ्या सर्व मार्गांवरील शेअर भाड्यात दोन ते तीन रुपयांची भाडेवाढ करत तसे दरपत्रक संघटनेने प्रसिद्ध केले आहे. या भाडेवाढीला आरटीओची परवानगी असल्याचे पत्रक संघटनेकडून प्रसिद्धीसाठी देण्यात आल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरटीओकडून रिक्षा भाड्यांत कोणतीही अधिकृत वाढ करण्यात आलेली नसून दोन प्रवाशांची वाहतूक करताना रिक्षाचालकांचे नुकसान अपेक्षित नाही. म्हणून रिक्षाचालकांनी मीटर रिक्षाभाडे आणि त्यावरील कराइतके भाडे तीनऐवजी दोन प्रवाशांमध्ये विभागत तेवढे भाडे प्रवाशांना आकारावे. मात्र, त्यापेक्षा जास्त भाडे आकारण्यास रिक्षाचालकांना परवनागी नसल्याचे त्यांनी सांगितले.

तीन प्रवाशांना घेऊन प्रवासात

एकीकडे वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून नियम आणखी कडक केले जात असताना रिक्षा संघटनांकडून मात्र रिक्षातून ३ प्रवाशांना घेऊन वाहतूक करण्याची परवानगी असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आल्याने संघटनांचा निर्णय मनमानी असल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *