सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. गावातील गट तट आमने सामने उभे राहिले आहेत. तर काही गावात सरपंचपदासाठी कोट्यवधींच्या बोली लागल्या आहेत. मात्र लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी ग्रामस्थांनी वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. ग्रामपंचायत निवडणूक तर बिनविरोध झालीच आहे. सगळ्या सदस्या या महिला आहेत . गावकऱ्यांनी एकमुखाने कारभार महिलांच्या हाती सोपवला आहे. लातूर जिल्ह्यातील 408 ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणार आहेत. त्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात वेगळा पॅटर्न निर्माण करण्याचे काम आनंदवाडीने केले आहे
लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी हे गाव अतिशय छोटेखाणी आहे. गावाची लोकसंख्या ही सातशेच्या आसपास आहे. एकूण मतदार संख्या 442 आहे. गावाचे संपूर्ण अर्थकारण शेतीवरच अवलंबून आहे. मात्र मागील पंधरा वर्षापासून गावाने सतत विकासाची वेगळी वाट धरली आहे. ह्याची सुरुवात झाली ती महिला सरपंचपद आरक्षित झाल्यावर… गावाने कारभार महिलेच्या हाती सोपवला आणि विकासाची वाट दिसू लागली. त्यानंतर गावाने सतत विकासात्मक निर्णय घेतले आहेत. संपूर्ण गाव हगणदारीमुक्त आहे. बंदिस्त नाल्या आहेत ,पक्के बांधीव रस्ते आहेत, उद्यान आणि व्यायामशाळा आहे. संपूर्ण गावात नळाने पाणीपुरवठा नियमित केला जातो. गावातील कोणत्याही घरात हुंडा घेतला किंवा दिला जात नाही, मोफत पिठाची गिरणी आहे. पाण्यासाठी आरो सिस्टीम बसविण्यात आली आहे. देहदानचा संकल्प करणारे गाव म्हणून ही ह्या गावाची वेगळी ओळख आहे. निर्मलग्राम पुरस्कार ही गावाला मिळाला आहे.
गाव जे करू शकतो ते राव करू शकत नाही. या गावाने पद आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी सरपंचपदा साठी बोली लावणाऱ्या तथाकथिक मोठ्या लोकांचे खुजेपणा अधोरेखितच केला नाही तर ह्या माध्यमातून गावाचा विकास कसा केला जातोय हे ही स्पष्ट केले आहे. लोकशाहीत बिनविरोध ग्रामपंचायत कशी काढावी .. ह्याचा वस्तूआठ घालून देणारे हे गावाचे … ह्या मुळेच ह्या गावाचा पॅटर्नच वेगळा आहे .. आनंदवाडी पॅटर्न
