वंदेभारत अभियानांतर्गत २१ हजार प्रवासी मुंबईत

करोना साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे वेगवेगळ्या देशात अडकलेले सुमार २१ हजार नागरिक गेल्या काही दिवसांत मुंबईत दाखल झाले आहेत. पुढील दोन दिवसांत आणखी काही प्रवाशांना घेऊन ३० विमाने मुंबईत दाखल होणार आहेत.

टाळेबंदीमुळे वेगवेगळ्या देशांत अडकून पडलेल्या नागरिकांना भारतात येण्यासाठी वंदेभारत अभियानांतर्गत विमानसेवा सुरू करून त्यांचा परतीचा मार्ग मोकळा करण्यात आला.

मुंबईत आतापर्यंत १४१ विमानांनी २१ हजार ७५३ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. १ जुलै पर्यंत आणखी ३० विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.

आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ७९२१ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ७५७२, तर इतर राज्यांमधील प्रवाशांची संख्या ६२६० इतकी आहे.

आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाइन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हॉगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हिएतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व अफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्यूयॉर्क या देशातून प्रवासी मुंबईत आले आहेत.

विलगीकरणाची सुविधा

मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्य़ांतील प्रवाशांना त्यांच्या-त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्य़ात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *