बिहार-उत्तरप्रदेशात वादळी पावसाचा कहर, विजा कोसळून दोन दिवसात 110 जणांचा मृत्यू

बिहार आणि उत्तर प्रदेशात मागील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजवला आहे. बिहारमध्ये मागील अनेक तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. वादळी पावसात वीज कोसळून झालेल्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत 110 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 32 लोक जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील दोन्ही राज्यात झाली आहे. पाटण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून आतापर्यंत एकूण 83 लोकांचा मृत्यू झाला आहे.

बिहारच्या गोपालगंज, पूर्वी चंपारण, सिवान, बांका, दरभंगा, भागलपूर, मधुबनी आणि नवादा या जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. दरम्यान हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस बिहारमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने बिहारमध्ये पुढील 72 तासांचा अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिहार आणि उत्तरप्रदेशातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि वीज कोसळल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या मिळाल्या, राज्य सरकारं बचावकार्यात तत्पर आहेत, मी मृतकांच्या परिवाराप्रती संवेदना व्यक्त करतो, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत शोक व्यक्त केला आहे.

कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी देखील या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना पीडितांची मदत करण्याचे आवाहन केले आहे. ‘बिहारमध्ये वीज कोसळून 83 जणांच्या मृत्यूचे वृत्त ऐकून स्तब्ध आहे, ईश्वर मृतकांच्या परिवाराला या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

बिहारच्या 23 जिल्ह्यांमध्ये 83 जणांचा मृत्यू वीज कोसळून झाला आहे, एकट्या गोपालगंज जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सोबतच नवादा आणि मधुबनी जिल्ह्यात आठ-आठ, सिवान आणि भागलपूर प्रत्येकी सहा,  पूर्वी चंपारण, दरभंगा आणि बांकामध्ये पाच-पाच तर खगडिया,औरंगाबाद मध्ये तीन-तीन, पश्चिम चंपारण, किशनगंज, जहानाबाद, जमुई, पूर्णिया, सुपौल, बक्सर आणि कैमूरमध्ये दोन-दोन तर समस्तीपुर, शिवहर, सारण, सीतामडी आणि मधेपुरामध्ये प्रत्येकी एक-एक व्यक्तिचा मृत्यू झाला. दुसरीकडे उत्तरप्रदेशमध्ये देखील पावसाने कहर केला आहे. लखनौमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गुरुवारी राज्यात वादळी पावसात वीजा कोसळून 24 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *