डोक्यावरील छताची चिंता करू नका; करोनाने दगावलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय

कर्तव्यावर असताना करोनाने दगावलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एखादा पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी करोनाने दगावल्यास त्याच्या सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्याच्या कुटुंबीयांना शासकीय निवासस्थानात अधिकृतपणे राहता येईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

करोनाच्या युद्धात फ्रंटलाईनवर लढताना आपला जीव गमावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या डोक्यावरील छताची चिंता करू नये, असं सांगतानाच कोविड -१९ मुळे मृत्यू पावलेल्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानी राहता येईल, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

सरकारने माणुसकीच्या नात्याने हा निर्णय घेतला आहे. पोलिस कर्मचार्‍यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या बदल्यात आपण कमीतकमी हे करू शकू. कोविड -१९ च्या अनुषंगाने कर्तव्यावर असताना ४२८८ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३२३९ जण पूर्णतः बरे झाले आहे, ही आनंददायक बाब आहे परंतु, ५१ जणांचा बळी देखील गेला आहे ही खेदाची बाब आहे, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

गेल्या चोवीस तासांत मुंबई पोलिस दलातील ३ कर्मचाऱ्यांचा करोनामुळं मृत्यू झाला. तर आत्तापर्यंत राज्यात ५४ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ३८ पोलिसांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहेत. एकूण करोना बाधित पोलिसांपैकी ३ हजार २३९ पोलीस बरे होऊन घरी परतले आहेत तर ९९१ पोलिसांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुंबई पोलिस दलात करोनाबाधितांची संख्या आधिक आहे. यासाठीच पोलिसांसाठी वरळी पोलिस कॅम्पमध्ये १०० खाटांचे कोव्हिड सेंटर उभं करण्यात येत आहे. या सेंटरमध्ये करोनाबाधित पोलिसांवर उपचार केले जाणार आहेत. वरळी भागात मोठ्या प्रमाणात पोलिस वसाहत आहे. या वसाहतीमध्येही आतापर्यंत अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. पोलिसांमधील वाढता संसर्ग ही पोलिस कटुंबीयांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, राज्यात आता करोना व्हायरसपासून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येनं रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल एकाच दिवशी विविध रुग्णालयांतून ३ हजार ६६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ८४४ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्ण बरे झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *