दगड घालून खून, अर्धा जळालेला मृतदेह नदीत फेकला

मित्रांसोबत गांजा पिताना झालेल्या भांडणातून चार जणांनी मिळून तरुणाचा गळा आवळून; तसेच डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी डिझेल टाकून दोनदा मृतदेह जाळला; तरीही मृतदेह पूर्ण न जळाल्याने अर्धा जळालेला मृतदेह पवना नदीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींना प्रथम अटक आणि त्यानंतर बेपत्ता झालेल्याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

बिल्लू उर्फ विकी उर्फ जसबीरसिंग गुलजारसिंग विरदी (१९, रा. मिलिंदनगर, रिव्हर रोड, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नीरज अशोक जांगयानी (२६), ललित लालचंद ठाकूर (२१), योगेश केशव पंजवाणी (३१), हरज्योतसिंग रणजितसिंग लोहिर (२२, सर्व रा. पिंपरी) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

बिल्लू घरी न आल्याने ८ मार्च २०२० ला पिंपरी पोलिस ठाण्यात बिल्लूच्या बेपत्ता होण्याची नोंद करण्यात आली होती. रविवारी (२१ जून) पिंपरी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींसोबत पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, पुढील तपास सुरू आहे.

अशी घडली घटना…

– आरोपी आणि बिल्लू मित्र होते. ते डेअरी फार्म रोडवर गांजा पिताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला.

– त्यातून चार जणांनी बिल्लूला गळा दाबून व दगडाने ठेचून ठार मारले.

– त्यानंतर बिल्लूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी मृतदेह डेअरी फार्म रोडवरील मंदिराच्या मागे नेला.

– बिल्लूच्या अंगावर डिझेल टाकून मृतदेह पेटवून दिला. दोनदा जाळूनही अर्धवटच जळालेला मृतदेह दापोडी येथील पुलावरून नदीत फेकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *