लडाखमध्ये २० भारतीय जवानांचे प्राण घेणाऱ्या चीनने पुन्हा एकदा भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. शांततेच्या मार्गातून प्रश्न सोडवण्याची टिमकी वाजवणाऱ्या चीनने भारताला अप्रत्यक्षपणे हायड्रोजन बॉम्बची धमकी दिली आहे.
चीन सरकारचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने एका ट्विटच्या माध्यमातून भारताला इशारा दिला आहे. चीनने १९६७ मध्ये हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. त्याचाच व्हिडिओ ग्लोबल टाइम्सने शेअर केला आहे. हायड्रोजन बॉम्ब हा आत्मसंरक्षणेसाठी असून आमचा देश पहिल्यांदा अणवस्त्रांचा वापर करणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. आजच्या दिवशी १९६७ मध्ये चीनने आपल्या पहिल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली होती. चीनने आत्मरक्षणासाठी अणवस्त्र कार्यक्रमावर काम केले असून पहिल्यांदा अणवस्त्रांचा वापर करणार नसल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
भारत आणि अमेरिकेसोबत चीनचे संबंध तणावपूर्ण असतानाच हा व्हिडिओ पोस्ट झाल्यामुळे त्याची अधिक चर्चा सुरू आहे. चीनने एकप्रकारे भारत आणि अमेरिकेला धमकावण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सुरू आहे. अणवस्त्रांवर देखरेख ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेनेदेखील चीन आपल्या अणवस्त्र साठ्यांमध्ये वाढ करत असल्याचे म्हटले आहे. चीनकडे सध्या ३२०० अणू बॉम्ब असल्याचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, भारतीय जवानांचे प्राण घेणाऱ्या चीनने भारताविरोधात बोंबा मारण्यास सुरुवात केली. भारतीय सैन्यानेच चीनच्या सैनिकांवर हल्ला केला. त्याच्या प्रत्युत्तरात भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले असल्याचे चीनने म्हटले आहे. सीमावाद हा चर्चेतूनच सोडवण्यात येणार असल्याची भूमिका चीनने मांडली आहे. तर, भारत आणि चीन या दोन्ही देशांनी संयमाने परिस्थिती हाताळण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्र संघाने केले आहे. भारत-चीनमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटले आहे.
