कोरोनाच्या या महासंकटामध्ये केवळ राज्यच नाही तर देशभरातील सगळ्याच क्षेत्रांमध्ये मंदीचं वातावरण पाहायला मिळतंय. शेती क्षेत्रावर तर कोरोनाचा वाईट परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत असतानाच आता शेतकऱ्यांना लागणाऱ्या सोयाबीनचे बियाण्यांच्या किमतींमध्ये महाबीजने 30 किलोच्या बॅगमागे तब्बल 360 रुपयांनी वाढ केली आहे. म्हणजेच क्विंटल मागे एक हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ केल्याने शेतकाऱ्यातून संताप व्यक्त केला जातं आहे.
महाबीज हे महामंडळ सरकारच्या आधीन राहून काम करतं. मागच्या वर्षीच्या खरीपामध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झालं होतं. त्याचा मोठा परिणाम सोयाबीनच्या प्रतवारीवर झाला आहे. बियाण्यांसाठी वापर केले जाणारे सोयाबीन हे चांगल्या प्रतीचे असते आणि या सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे ही वाढ करावी लागत असल्याचे महाबीजकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मागच्या वर्षी शेतकऱ्यांना महाबीजकडून बियाण्यासाठी दिले जाणाऱ्या सोयाबीन हे हे 62 रुपये प्रति किलो या भावाने दिले जायचे. यावेळेस यामध्ये बारा रुपये किलोला भाव वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच 30 किलो बॅगमागे तब्बल 360 रुपयांची भाववाढ झाली आहे. तर क्विंटल मागे एक हजार रुपये पेक्षाही जास्तीची भाव वाढ केल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.
महाबीज राज्यातील शेतकऱ्याकडून सोयाबीनचे बीजोत्पादन करून घेत असते. मागच्या वर्षी सोयाबीनच्या बीज उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 4160 रुपयांचा भाव मिळाला होता. यावर्षी यात एक हजार रुपयांनी वाढ करून 5182 रुपये प्रतिक्विंटल ने महाबीजने शेतकऱ्याकडून सोयाबीनचे बियाणे घेतले आहे. उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे सोयाबीनच्या बियाण्यांमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे.
